
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्धल केलेले भाष्य सध्या गाजत असताना उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तर देत पलटवार केला (Uddhav Thackeray on Sharad Pawar) आहे. “मुख्यमंत्री म्हणून मी काय केले, हे जगजाहीर आहे. प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतो” असा दावा करीत ठाकरे यांनी पवारांना उत्तर दिले. मुख्यमंत्री या नात्याने ठाकरे यांच्यातील कमतरता शरद पवार यांनी अधोरेखित केल्या आहेत. त्यावर प्रथमच ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरही बोलण्यास नकार दिला. “प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन करण्याचा अधिकार असतो. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय होऊ द्या. त्यावर मग बोलेन. मात्र, शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार नाही” असे ठाकरे म्हणाले. शरद पवारांना मी काय सल्ला देणार? मी दिलेला सल्ला त्यांना पचनी नाही पडला, तर काय करू? त्यांच्यावर कार्यकर्त्यांचे प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना ठाकरे यांनी आपल्याकडूनही महाविकास आघाडीला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली. मोदींचा नाही, तर प्रवृत्तीच्या पराभवासाठी आम्ही एकत्र आल्याचे ते म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
शिवसेनेतील असंतोषाचा उद्रेक शमवायला नेतृत्व कमी पडले. संघर्ष न करता उद्धवने राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला..”, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले राजकीय आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारित आवृत्तीत मांडले (Sharad Pawar Political Autobiography) आहे. मंगळवारी या सुधारित आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. “महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात ठाकरे यांनी माघार घेतली. शारीरिक अस्वास्थ्य हे त्यामागचे कारण असावे. करोनाच्या काळात राष्ट्रवादीचे सारे मंत्री मैदानात सक्रिय होते. उद्धव ठाकरे हे प्रशासनाच्या संपर्कात होते पण दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून. महाविकास आघाडीचे सरकार हे भाजपला देशभरात मिळालेले सर्वात मोठे आव्हान होते. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार याची कल्पना होती”, असेही पवारांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे.
तो अंदाज नव्हता..
“आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेतच वादळ माजेल याचा अंदाज आला नव्हता…” असे नमूद करून शरद पवार लिहितात की, “राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी आवश्यक असते. त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. उद्या काय होऊ शकते, याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत, याचे राजकीय चातुर्य आवश्यक असते. याबाबतीत आम्हाला सर्वांनाच कमतरता जाणवत होती. उद्धव ठाकरे यांना अनुभव नसल्याने हे घडले असले तरी ते टाळता आले असते..” असे पवार नमूद करतात.