

जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे येथे ८ वी युवा संसद
पुणे :राजकारणाबद्दल अनेकांच्या मनात नकारात्मक भावना असतात आणि अनेकजण त्या उघडपणे व्यक्तही करतात. मात्र, राजकारण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून, ते गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ते पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स येथे आयोजित आठव्या युवा संसदमध्ये बोलत होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना ‘आदर्श आमदार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अशा पुरस्कारामुळे शंभरपट अधिक शक्तीने काम करण्याची ऊर्जा मिळते, अशी भावना यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री राज्यसभा सदस्य भागवत कराड, खा. अरविंद सावंत, आ. सत्यजित देशमुख, आ. अमित गोरखे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी युवकांना अनेक उदाहरणे आणि कथांच्या संदर्भातून राजकारणाचे आणि त्यातील गांभीर्याचे महत्त्व पटवून दिले.
राजकारण म्हणजे निवडणूक हा चुकीचा समज आहे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नाही. राजकारणाचा उपयोग समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी असावा असे आ. मुनगंटीवार म्हणाले. देश बदलायला हवा, देश पुढे जायला हवा, असे प्रत्येकाला वाटते मात्र हे साध्य करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. राजकारण त्या परिवर्तनाची संधी देते, असे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. राजकारणातून अनेक चिरकाल परिवर्तनकारी कार्य करण्याची संधी मिळते. राजकारणात न जाण्याचा सल्ला देणे हा चुकीचा भ्रम आहे. गोरगरीब, शोषीत वंचितांचे मन जिंकण्याचे माध्यम म्हणजे राजकारण आहे, असेही ते म्हणाले.
युवा संसदेचे उत्तम आयोजन आणि नियोजनाबद्दल त्यांनी डॉ. सुधाकरराव जाधवर व शार्दुल जाधवर यांचे अभिनंदन केले. वनमंत्री असताना गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात गेल्याची आठवण मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितली.जनतेच्या हितासाठी कल्याणकारी निर्णय घेण्याचे कार्य राजकारणातून होते, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.