उद्धव ठाकरे यांनी कोणती 5 महत्त्वाची आश्वासनं दिली?

0
xr:d:DAF3MoyTp_A:16,j:575747400636105177,t:23121705

1. राज्यातील विद्यार्थिनींना सरकारकडून मोफत शिक्षण दिले जाते. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. मुलगा आणि मुलगी दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे मुलांनाही मोफत शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

2. पोलीस ठाण्यात गेल्यावर महिलांना कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेले पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल.

3. मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे देऊ. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना सांगितले. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबईवर तुमचा हक्क आहे. आगामी काळात मविआची सत्ता आल्यास आम्ही धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन घेऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

4. राज्यातील शेतकऱ्यांना मविआची सत्ता आल्यास हमीभाव दिला जाईल. आमचं सरकार पडलं नसतं तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता. पण आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

5. आमचे सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आता पुन्हा आमची सत्ता आली की महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.