

कोलकाता(Kolkata), 28 मे पश्चिम बंगालमध्ये रेमल चक्रीवादळामुळे 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. राज्यातील 24 ब्लॉक आणि 79 महापालिका प्रभागांमधील सुमारे 29 हजार 500 घरांचे नुकसान झाले आहे. यापैकी बहुतांश दक्षिणेकडील किनारपट्टी भागात आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने आज, मंगळवारी ही माहिती दिली.(Tropical Cyclone Remal)
यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, राज्यातील विविध भागात 2,140 हून अधिक झाडे उन्मळून पडली आणि सुमारे 1,700 विद्युत खांब पडले. प्राथमिक अंदाजानुसार 27 हजार घरांचे अंशत: तर 2500 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. मूल्यांकन अजूनही चालू आहे. त्यामुळे ही आकडेवारी वाढू शकते. ते म्हणाले की, प्रशासनाने दोन लाख 7 हजार 60 लोकांना 1,438 सुरक्षित आश्रयस्थानात नेले. सध्या तेथे 77 हजार 288 लोक आहेत. सध्या 341 किचनमधून त्यांना अन्न पुरवठा केला जात आहे. किनारपट्टी आणि सखल भागातील बाधितांना 17 हजार 738 ताडपत्रींचे वाटप करण्यात आले आहे. चक्रीवादळ प्रभावित भागात काकडद्वीप, नामखाना, सागर द्विप, डायमंड हार्बर, फ्रेजरगंज, बकखली आणि मंदारमणी यांचा समावेश आहे.
चक्रीवादळामुळे बंधाऱ्यांना किरकोळ भेगा पडल्या होत्या. त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, अद्यापपर्यंत बंधारा फुटल्याची कोणतीही माहिती नाही. राज्यात चक्रीवादळामुळे आतापर्यंत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोलकात्यात एक महिला, दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यातील 2 महिला, उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यात एक आणि पूर्व मेदिनीपूरमध्ये पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. किनारपट्टी भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. पश्चिम बंगाल आणि शेजारील बांगलादेश या दोन्ही ठिकाणी गंभीर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.