मोठ्या प्रमाणावर वृक्षांमुळे संगमनेर शहराचे तापमान कमी

0

अहमदनगर, 19 मे : यावर्षीचा उन्हाळा हा अत्यंत कडक आहे.वातावरणातील बदलामुळे तापमान खाली आले असले तरी मागील आठवड्यापर्यंत ४२ अंशापर्यंत तापमान असतानाही संगमनेर शहरात असलेल्या घनदाट वनराईमुळे व विविध वृक्षांमुळे शहरातील नागरिकांना या उखाड्यापासून दिलासा मिळाला असून संगमनेर शहराचे तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत राहिले.असून विविध वृक्षांमुळे संगमनेर शहर हे झाडांचे शहर म्हणून ओळखले जात असल्याचे दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख व नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी स्वच्छ व सुंदर संगमनेर शहराबरोबरच शहरात अनेक ठिकाणी हजारो वृक्षांचे रोपण केले.दंडकारण्य अभियानांतर्गत मोकळ्या जागेत,रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण व संगोपन झाल्याने संगमनेर शहर हे झाडांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.आगामी काळातील उष्णतेचा धोका लक्षात घेऊन दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हीट ॲक्शन प्लॅन राबवत संगमनेर शहरात नगरपरिषदेने २५ गार्डन निर्माण केले.त्यामध्ये झाडे,लॉन,फुलझाडे,तसेच म्हाळुंगी,नाटकी,व प्रवरा या नद्यांच्या किनारपट्ट्यांवर अनेक वृक्ष लागवड केली आहे.यामुळे हा परिसर हिरवाईने फुलला आहे.तसेच प्रत्येक रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण असल्याने भर उन्हाळ्यात रस्त्यावर मोठी सावली दिसत आहे.ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना या सावलीचा मोठा दिलासा मिळाला.तसेच संगमनेर शहरातील तापमान कमी करण्यामध्ये या वनराईचा मोठा वाटा राहिला.

महाराष्ट्रातील तापमान ४४-४५ अंश सेल्सिअस वर गेले असताना संगमनेर तालुक्यामध्येही ४२ अंशापर्यंत तापमान गेले.मात्र दंडकारण्य अभियानातून गावोगावी झालेले वृक्षारोपण आणि वृक्ष संस्कृती बाबत जाणीव जागृती यामुळे संगमनेर तालुक्याचे तापमान इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी राहिले.त्याचबरोबर संगमनेर शहरातही या वृक्षांमुळे चार ते पाच अंश सेल्सिअसने तापमान कमी झाल्याने उकाड्यापासून शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.गर्द सावली बरोबर शुद्ध ऑक्सिजन देणाऱ्या या झाडांमुळे संगमनेर शहर थंड हवेचे ठिकाण व ऑक्सिजन युक्त शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.यासाठी विविध सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला.अनेक ठिकाणी झाडे लावण्याबरोबर त्यांचे संगोपन,ट्री गार्ड लावून झाडी वाढवणे,फुल झाडे लावणे,रस्त्यांच्या मधोमध व दुतर्फा वृक्षारोपण,मोठ मोठ्या झाडांचे संगोपन,यामुळे संगमनेर शहर हे हिरवाईने दाटलेले झाडांचे शहर दिसत आहे.या विविध झाडांमुळेच शहराची सुंदरता वाढत असून या झाडांमुळे उष्णता कमी होण्याबरोबर ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे.