“तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा होणार”

0

नवी दिल्ली(New Delhi), 03 जुलै :- पेपरफुटीसारख्या संवेदनशील विषयांवर राजकारण होऊ नये अशी आमची इच्छा होती. परंतु, विरोधकांना त्याची सवय पडली आहे. तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याची ग्वाही पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी आज, बुधवारी राज्यसभेत दिली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

नीट-यूजी परीक्षेतील भ्रष्टाचार आणि यूजीसी-नेट परीक्षेतील पेपरफूट या विषयांवरून विरोधकांनी गेले काही दिवस रान उठवले आहे. यामुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन असल्याचा विरोधकांचा आरोप होता. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बुधवारी राज्यसभेत या विषयावर भाष्य केले. मोदी म्हणाले की, हा संवेदनशील विषय असून त्यावर राजकारण व्हायला नको. परंतु, विरोधक प्रत्येक गोष्टीचे राजकारण करतात कारण त्यांना तशी सवयच पडली आहे. परीक्षेतील भ्रष्टाचारासाठी दोषी असणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली. यावेळी विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले की, आम्ही आणीबाणीच्या मुद्द्यावर काही बोलल्यावर म्हणतात, ती जुनी गोष्ट आहे. तुमची पापे जुनी होतात का ? त्यावेळी जयप्रकाश नारायण यांची तब्येत इतकी बिघडली की, ते पुन्हा उठू शकले नाहीत से मोदींनी यावेळी सांगितले.

काँग्रेससोबत बसलेल्या अनेक पक्षांची काही मजबुरी असेल. त्यांच्यासोबत बसलेले अनेक पक्ष अल्पसंख्याकांसोबत असल्याचा दावा करतात. आणीबाणीच्या काळात तुर्कमान गेट आणि मुझफ्फरनगर येथे जे घडले, त्याबद्दल बोलण्याचे धाडस ते करू शकतात का ? आता हेच लोक काँग्रेसला क्लीन चिट देत आहेत. काँग्रेस ही परजीवी आहे, देशातील जनतेने आजही त्यांना स्वीकारलेले नाही. त्यांना खोट्या गोष्टी आणि बनावट व्हिडिओद्वारे देशाची दिशाभूल करण्याची सवय असल्याचा टोला मोदींनी लगावला. काँग्रेसवाल्यांनी निर्लज्जपणे भ्रष्टाचारी बचाव आंदोलन सुरू केले. आम्ही कारवाई का करत नाही, अशी विचारणा आम्हाला करायचे. आता भ्रष्टाचारी तुरुंगात जात आहेत, तर हेच लोक तपास यंत्रणांवरच प्रश्न उपस्थित करत आहेत.

दिल्लीत आम आदमी पार्टीने (आप) घोटाळा केला तर काँग्रेसवाले तक्रार करतात अन् सरकारने कारवाई केली तर मोदीला शिव्या देतात. काँग्रेसने पत्रकार परिषदेत आप विरोधात दिलेले पुरावे खोटे होते का, हे सांगावे. हे दुटप्पी लोक आहेत, सगळा ढोंगीपणा सुरू आहे. हे लोक दिल्लीत एका मंचावर बसून भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी रॅली काढतात. त्यांचेच राजपुत्र त्यांच्या एका सहकारी मुख्यमंत्र्यांना केरळमध्ये तुरुंगात पाठवण्याची भाषा वापरतात अशी टीका मोदींनी यावेळी केली.

ईडी, सीबीआयच्या गैरवापराबाबत होणाऱ्या आरोपाला उत्तर देताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराविरोधात कारवाई, हे आमचे ध्येय आहे. हा आमच्यासाठी निवडणुकीतील मुद्दा नाही. आम्ही 2014 मध्ये सरकार स्थापन केले, तेव्हा म्हटले होते की आमचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करेल. आमचे सरकार भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर हल्ला करेल. आम्ही गरीब कल्याण योजना राबवत आहोत. काळ्या पैशाविरोधात आम्ही कायदा केला. आम्ही डीबीटी सुरू केला, डिजिटल तंत्रज्ञान वापरले. जेव्हा योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांचा लोकशाहीवरील विश्वास वाढतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे, मी तिसऱ्यांदा इथे बसलो आहे. मी स्पष्टपणे सांगतो की, आम्ही एजन्सींना भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यास मोकळीक दिली आहे. एकही भ्रष्टाचारी वाचणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.