

नालंदा(Nalanda), 19 जून :- भारतासोबतच जगातील अनेक देशांचा वारसा नालंदाशी जोडला गेलाय. आग्नीज्वाळात पुस्तके जळतात पण, ज्ञान अबाधित राहत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी केले. बिहारच्या राजगीर इथल्या नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झाला.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या 10 दिवसांतच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नालंदाला भेट देण्याची संधी मिळाली. ही बाब भारताच्या विकासाच्या प्रवासाचे एक शुभ चिन्ह म्हणून मानतो. नालंदा ही एक ओळख आहे, सन्मान आहे. नालंदा एक मूल्य आहे, एक मंत्र आहे, एक अभिमान आहे, एक कथा आहे. नालंदा हे एक असे सत्य आहे जे स्पष्टपणे सांगते की, अग्नीच्या ज्वाळांमध्ये पुस्तके जळू शकतात, परंतु अग्नीच्या ज्वाला ज्ञानाचा नाश करू शकत नाहीत असे मोदी यांनी सांगितले. तसेच नालंदा विद्यापीठातील नवीन कॅम्पस भारताची नवी क्षमता जगाला दाखवेल. नालंदा दाखवून देईल की जी राष्ट्रे भक्कम मानवी मूल्यांवर आधारित असतात, त्यांना इतिहासाचे पुनरुज्जीवन करून चांगल्या भविष्याचा पाया घालणे जमते असे मोदी म्हणाले.
नालंदा हे केवळ भारताच्या भूतकाळाशीच निगडीत नाही, तर जगातील आणि आशियातील अनेक देशांचा वारसा त्याच्याशी निगडीत आहे. आमच्या भागीदार देशांनीही नालंदा विद्यापीठाच्या पुनर्बांधणीत सहभाग घेतला आहे. या निमित्ताने मी भारताच्या सर्व मित्र देशांचेही अभिनंदन करतो. प्राचीन नालंदामध्ये मुलांचा प्रवेश त्यांच्या ओळख किंवा राष्ट्रीयत्वाच्या आधारावर केला जात नव्हता. प्रत्येक देशातून आणि प्रत्येक वर्गातील तरुण इथे यायचे. नालंदा विद्यापीठाच्या या नव्या कॅम्पसमध्ये पुन्हा तीच प्राचीन व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवली जाईल. ‘वसुधैव कुटुंबकम्’ याचे नालंदा हे सुंदर प्रतीक असल्याचे मोदींनी सांगितले.