राजस्थानपासून मणिपूरपर्यंत जमीन हादरली; जयपूरमध्ये एका तासात तीन भूकंपाचे धक्के

0

 

शुक्रवारी पहाटे राजस्थान (Rajasthan) ते मणिपूरपर्यंत (Manipur) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. एकीकडे राजस्थानमध्ये वारंवार भूकंपाचे (Rajasthan Earthquake) धक्के जाणवत होते, तर दुसरीकडे मणिपूरमध्येही भूकंपामुळे जमीन हादरली होती. जयपूरमध्ये पहाटे 4.09 ते 4.23 पर्यंत तीन मोठे भूकंपाचे धक्के जाणवले. राजघनीसह राज्यातील इतर शहरांमध्येही पहाटे साडेचार वाजेपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते. जयपूरमधील भूकंपामुळे लोक इमारतींमधून बाहेर पडले आणि रस्त्यावर आले. जयपूरमधील रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.4 इतकी सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे मणिपूरच्या उखरुलमध्ये सकाळी 6 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली आहे.

नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीच्या वेबसाइटनुसार राजस्थानमध्ये पहाटे 4.09 वाजता पहिला भूकंप झाला. दुसरा 4:22 वाजता आणि तिसरा भूकंपाचा 4.25 वाजता जाणवला. या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले आहे. पहाटेच झालेल्या या भूकंपाने झोपलेले सर्वच लोक जागे झाले. भूकंपाचे धक्के जाणवताच सर्वजण घराबाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक फोनवर त्यांच्या नातेवाईकांबाबत माहिती घेताना दिसत होते.