गडचिरोली येथे ओबीसी जागर यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

 

• खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, प्रशांत वाघरे आदींनी केले मार्गदर्शन

नागपूर-संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणाऱ्या भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेतर्फे आज तिसऱ्या दिवशी गडचिरोली येथे मेळावा घेण्यात आला. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष र. देशमुख,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, सहसंपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही ओबीसी जागर यात्रा सध्या पूर्व विदर्भात फिरत आहे.
गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यावेळी म्हणाले, “कॉंग्रेसच्या काळात आदिवासी गावे ओबीसीमध्ये आणि ओबीसी गावे आदिवासीमध्ये टाकून संभ्रम निर्माण कारण्यात आला. उद्धव ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाची वाट लावली. कॉंग्रेस जनतेची दिशाभूल करीत आहे. १२ बलुतेदार ओबीसीमध्ये येतात. ऑगस्ट २०२३ च्या जीआर नुसार पदभरतीमध्ये आरक्षणाचे निकष लावून पदभरती व्हावी, ही अपेक्षा आहे. मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने जनतेच्या हितासाठी अनेक चांगली कामे केली आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत ३ लाखांपर्यंत कर्ज मिळणार, ही फार महत्वाची गोष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मागील ९ वर्षातील कार्यामुळे आणि राज्यातील महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठा विकास झालेला बघायला मिळत आहे. सर्वांगीण विकासाचे कार्य या भाजपा सरकारमुळे सर्वत्र होत आहे. सुरजागड येथील पोलाद प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी भाजपाने अनेक योजना राबविल्या आहेत. त्या महत्वाकांक्षी आणि विकासाभिमुख योजनाची माहिती ओबीसी समाजाला मिळावी, म्हणून या ओबीसी जागर यात्रेचे आयोजन असल्यावर नेत्यांनी भर दिला. ओबीसी-कुणबी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ही भाजपाची भूमिका आहे. जरांगे पाटील जनतेची दिशाभूल करीत आहेत, खरे म्हणजे राज्य सरकारने त्यांना ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात काहीच आश्वासन दिलेले नाही. मराठ्यांना मिळालेलं आरक्षण उद्धव ठाकरे सरकारमुळे गेलं. गडचिरोली जिल्हा ‘पेसा’ कायद्यांतर्गत आला आहे. विरोधो पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी ओबीसी विभागाचे मंत्री असतांना येथील भूमिधारकांसाठी काय केलं, हा मोठा प्रश्न आहे. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं. गडचिरोली जिल्ह्यात सरकारी नोकर भरतीसाठी भाजपा प्रयत्न करेल. ओबीसींसाठी वैद्यकीय शिक्षणात आरक्षण आणि नि:शुल्क वसतिगृहाचा लाभ भाजपा सरकारने मिळवून दिला आहे. भाजपा ओबीसींचा आणि ओबीसी भाजपाचा हा आमचा मूलमंत्र असून ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. कॉंग्रेस राजकारण करीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते उलट्या बोंबा ठोकत आहेत.
आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, प्रशांतजी वाघरे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भाजपाने ओबीसी समाजासाठी ज्या योजना सुरु केल्या आहेत, त्याबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकार यांनी ओबीसींच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या असून त्याचा १००% फायदा ओबीसी समाजाला होणार आहे, असे ते म्हणाले. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते,रवींद्र चव्हाण यांनी यावेळी ओबीसी समाजाच्या प्रगतीवर भर दिला.
सौ. रेखाताई डोळस, सौ. संगीताताई रेवतकर, सौ. योगिताताई पिपळे, सौ. दिपाताई हिंग, रवींद्र गोटेफोडे, अनिल तिडके,अनिल पोहनकर, सदानंद कुथे,मुक्तेश्वर काटवे व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येत नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. आज यात्रा सावली, मूल मार्गाने चंद्रपूरकडे रवाना झाली.