

नागपूर (Nagpur):- पेंच व्याघ्र प्रकल्पात आता लवकरच बोटमध्ये बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी करणं शक्य होणार आहे. भारतातील पहिल्या बोट जंगल सफारीची नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात सुरुवात होणार आहे.जंगल सफारीत आपण जिप्सी किंवा हत्तीवर बसून जंगलात फेरफटका मारतो . मात्र आता लवकरच बोटमध्ये बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी करणं शक्य होणार आहे. भारतातील पहिल्या “बोट जंगल सफारी” ची (First Boat Jungle Safari) नागपूरातील पेंच व्याघ्र प्रकल्पात (Pench Tiger Reserve) जून महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात सुरुवात होणार आहे.
या बोट जंगल सफारीच्या माध्यमातून वन्यप्रेमी आणि पर्यटकांना नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रानगवे आणि इतर वन्य प्राण्यांचे निरीक्षण करता येणार. तसेच पाण्यातील मासे, मगरी आणि नदीच्या अवतीभवतीच्या क्षेत्रात राहणाऱ्या हजारो पक्ष्यांचे निरीक्षणही करता येणार आहे.
ही बोट जंगल सफारी 23 किलोमीटरची असून त्यासाठी अडीच तासांचा कालावधी लागणार आहे. सर्वात खास बाब म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पातील ज्या भागातून ही बोट जंगल सफारी सुरू होणार आहे, त्या भागातील जंगलात तब्बल वीस वाघांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वाघ प्रेमींसाठी ही बोट जंगल सफारी वेगळी पर्वणी ठरणार आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील या बोट जंगल सफारीमुळे जंगलाची शांतता भंग होणार नाही. तसेच कुठलेही ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण होणार नाही, यासाठी खास सोलर बोट वापरली जाणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम विभागात चोरबाहुली ते नागलवाडी रेंज दरम्यान बोटीतून ही जंगल सफारी करता येईल. त्याचे अंतर हे 23 किमी राहणार असून बोटीतून ही सफारी अडीच तासात पूर्ण करता येणार आहे. ज्या भागातून ही बोट जंगल सफारी होईल, त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या जंगलात सुमारे वीस वाघ असून हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात बोटीतील पर्यटकांना त्यांची हमखास दर्शन होईल, अशी अपेक्षा आहे. शिवाय अनेक पशू-पक्षी वन्यजीवसह निसर्गाची मनसोक्त आणि आल्हाददायक वातावरण देखील अनुभवता येणार आहे.