

रोटरी नागपूर एलिटचा पार पडला पदग्रहण समारंभ
नागपूर (Nagpur) :- २९ जून – रोटरी नागपूर एलिटचा पदग्रहण समारंभ, मुख्य अतिथी डिस्ट्रिक गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे आणि राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या उपस्थितीत दि. २९ जून रोजी पार पडला. याप्रसंगी, ज्योत्स्ना पंडित यांनी डॉ. सुषमा देशमुख यांच्याकडून वर्ष २०२५-२६च्या अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यासोबतच, प्रमोद मिसळ – सचिव (प्रशासन), विशाखा पवार – सचिव (प्रकल्प), डॉ. अजय पाटील – कार्यकारी सचिव, स्वप्ना नायर – प्रेसिडेंट इलेक्ट, संजय वानखेडे व सना ओपई – उपाध्यक्ष, संगीता पवार – कोषाध्यक्ष, संजय पट्टीवार – सहसचिव, नित्या बरडिया – सार्जंट अॅट आर्म्स, डॉ. प्रवीण चंदनखेडे – संचालक, सामाजिक सेवा (वैद्यकीय), अरविंद पाटील – संचालक, सामाजिक सेवा (गैर-वैद्यकीय), प्रशांर वर्हाडे – संचालक, युवक सेवा, डॉ. अनुजा ताम्हणे – संचालक, न्यू जनरेशन, स्नेहा नाहटा – संचालक, आंतरराष्ट्रीय सेवा, डॉ. सुधीर देशमुख – संचालक, व्होकेशनल सर्व्हिस, सोनाली जिचकार – संचालक, जनसंपर्क, मनीषा चौधरी – संचालक, महिला समिती. डॉ. सुषमा देशमुख, माजी अध्यक्ष यांनी संचालक मंडळ सदस्य म्हणून शपथ घेतली. अजय पाटील, प्रगती पाटील, रौनक कांडे, शिवांगी गर्ग, शुभंकर पाटील, ममता जयस्वाल संचालक मंडळाचे सल्लागार म्हणून कार्य करतील.
रोटरी नागपूर एलिटचा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारताना केलेल्या भाषणात ज्योत्स्ना पंडित यांनी यावर्षीची क्लबची थीम ग्रीन लिव्हिंग असून त्याला अनुसरून वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. रोटरीच्या इतर कार्यक्रमांबरोबरच कँसरमुक्त जगासाठी प्लास्टिकमुक्त किचन, नागपुरातील करवती काठाच्या साडीचे पुनरुज्जीवन – लोकल टू ग्लोबल प्रकल्प, जंगल व वृक्षतोडीला प्रतिबंधासाठी व परागसिंचनाला चालना देण्यासाठी बायोडायव्हर्सिटी पार्क, इमोशनल वेलनेस आणि आरोग्य, पर्यावरण संरक्षण, जेंडर इक्वॅलिटी या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करुन उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असेही त्या म्हणाल्या.
या समारंभात मुख्य अतिथी म्हणून बोलताना राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले की समाजामध्ये आज ज्या पद्धतीने ध्रुवीकरण होते आहे आणि जातींवरुन समाज विभाजित होतो आहे त्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब्जमध्ये समाजातील वैविध्याचे आणि एकजुटीचे, एकात्मिकतेचे प्रतिबिंब दिसते ही फार महत्त्वाची बाब आहे. सामाजिक दुफळी, नातेसंबंध दुरावणे, पर्यावरणाचा र्हास आणि प्रदूषणाचा विचार करता, भावनिक स्वास्थ्य आणि पर्यावरणस्नेही जगणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. हे सारे नुसते उपक्रम म्हणून सुरु करुन उपयोगाचे नाही तर पुढेही ते अतिशय जिकरीने आणि नेटाने राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मुख्य अतिथी म्हणून बोलताना डिस्ट्रिक गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे यांनी रोटरीतील मानवताभाव, रोटरी सदस्यांची कोणालाही मदत करण्याची सेवाभावी वृत्ती यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. पुढील वर्षभरात राबण्यात येणार्या उपक्रमांना आणि प्रकल्पांना काहीही हातचे न राखता मदत आणि पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महाराष्ट्राची सगळ्यात मोठा धार्मिक, संस्कृतिक वारसा असलेली पंढरपूरची विठ्ठल वारी यावर्षी २२ देश पार करीत ७० दिवस रस्त्याचा प्रवास करुन लंडनपर्यंत पोहोचली आहे आणि तिथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या युरोप मधील पहिल्या साकारत असलेल्या भव्य विठ्ठल- रुखमाई मंदिरात ती स्थापन करण्यात येणार आहे. या सगळ्यात अत्यंत मोलाचे आणि मोठे योगदान देणार्या व भारतातील समन्वयक म्हणून काम करणाऱ्या रोटेरियन मोहन पांडे आणि रोटेरियन विष्णु मनोहर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
पुढील वर्षभरात रोटरी एलिट राबवणार असणाऱ्या प्रकल्पांची
या समारंभात विस्तुत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवांगी गर्ग आणि राजवीर वानखेडे यांनी केले.