तंबाखू खावून थुंकणाऱ्यांचे फोटो पेपरमध्ये छापा

0

नागपूर (Nagpur), 02 ऑक्टोबर : विदेशात चॉकलेट खाल्ल्यावर वेष्टन खिशात ठेवतात. तर भारतात रस्त्यावर फेकण्याची सवय आहे. हे चित्र बदलले पाहिजे त्यासाठी पान, तंबाखू, गुटका खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे पोटो पेपरमध्ये छापावेत असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गांधी जयंतीनिमित्त बुधवारी नागपूर महापालिकेकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी (Municipal Commissioner Dr. Abhijeet Chaudhary) उपस्थित होते.

याप्रसंगी गडकरी म्हणाले की, मला देखील चॉकलेट खाल्ल्यावर गाडीतून वेष्टन रस्त्यावर फेकण्याची सवय होती. पण, नंतर ही सवय प्रयत्नपूर्वक बदलली. आता मी वेष्टन खिशात ठेवतो आणि घरी गेल्यावर डस्टबीनमध्ये टाकतो. नेते जगाला मार्गदर्शन करतात. पण व्यक्तिगत जीवनात अनुकरण करीत नाही. मी मात्र असे वागत नाही असे गडकरींनी सांगितले. इकॉलॉजी, पर्यावरण चांगले असले तर दवाखान्यात जायची वेळ येत नाही.

जल, वायू व ध्वनी प्रदुषणामुळे आयुष्य कमी करीत आहो. कचऱ्यातून संपत्ती निर्माण केली तर सर्व समस्या संपेल असे गडकरींनी सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्ली-मुंबई, ढोलेरा-अहमदाबाद तसेच इतर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीमध्ये कचऱ्याचे विलगीकरण करून कंत्राटदारांना या कचरा सामग्रीचे रस्ते बांधणीत वापर करण्याचे सांगितले असून आतापर्यंत 80 लाख टन कचऱ्याचा वापर रस्ते बनवल्याचे गडकरींनी सांगितले.

पूर्व नागपूरातील भांडेवाडी येथील कचरा डेपोतील पार्टिकलवर प्रक्रिया करून त्यामार्फत जैव खतांची निर्मिती सुद्धा आता होत असून या जैव खतांचा वापर केल्याने पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते. आणि ही खते रासायनिक खतांना पर्याय ठरतात असा दावा गडकरींनी केला. कचऱ्यापासून बायो सीएनजी निर्मिती शक्य असून महानगरपालिकेने आपल्या ताफ्यातील वाहने पेट्रोल डिझेल ऐवजी सीएनजी, बायो एलएनजी अशा अपारंपरिक इंधनांवर संचालित करावी अशी सूचना गडकरींनी केली.