

नवी दिल्ली(New Delhi), 7 जुलै :- महाप्रभू जगन्नाथ यांच्या पवित्र रथयात्रेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मोदी यांनी x च्या माध्यमातून पोस्ट केले आहे की:-
“पवित्र रथ यात्रेच्या आरंभानिमित्त शुभेच्छा. आम्ही महाप्रभू जगन्नाथ यांना अभिवादन करत आहोत आणि त्यांचे आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत अशी प्रार्थना करतो.
भगवान जगन्नाथ रथ यात्रेविषयी…
प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात ओडिसा येथील पुरी येथे भगवान जगन्नाथ रथ यात्रेचे आयोजन केले जाते. या रथ यात्रेवेळी अनेक नियमांचे पालन केले जाते. या रथ यात्रेला मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. असे म्हटले जाते की, रथ यात्रेवेळी रथ ओढला अथवा त्याला स्पर्श केल्याने आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात. यंदा रथ यात्रा आज (७ जुलै) सुरू झाली. ही रथ यात्रा ९ दिवसांनी म्हणजेच १६ जुलैला पूर्ण होणार आहे.
कधी सुरु होते रथ यात्रा?
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यातील शुल्क पक्षाच्या द्वितीयेला भगवान जगन्नाथ रथ यात्रा काढली जाते. ही रथ यात्रा पाहण्यासाठी जगभरातून ओडिसातील पुरी येथे दाखल होतात. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा आपली मावशी गुंडिचाला भेटण्यासाठी जात असल्याने या रथ यात्रेला विशेष महत्व आहे. असे मानले जाते की, रथ यात्रेत सहभागी होणारा व्यक्ती क्रोध, लोभ अशा गोष्टींपासून मुक्त होतो. आयुष्यात सुख येत त्याला मोक्षाची प्राप्ती होते.
१२ वर्षांनंतर बदलली जाते मूर्ती
जगन्नाथ रथ यात्रेसंदर्भात काही गूढ किंवा अजून याबाबत स्पष्ट माहिती समोर न आलेली तथ्येही आहेत. यापैकीच एक म्हणजे, प्रत्येक १२ वर्षांनंतर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची मूर्ती बदलली जाते. या अनुष्ठानला ‘नवकलेवर’ असे म्हटले जाते. याचा अर्थ असा होतो की, नव्या शरीराचे धारण करणे. जाणकरांनुसार, तिन्ही मूर्ती लाकडापासून तयार केल्या जातात. बदलत्या ऋतूनुसार, लाकडामध्ये संभाव्य बदल होत असल्याने मूर्ती बदलल्या जातात.
जगन्नाथपुरी हे भारतातील चार धामांपैकी एक आहे. श्री जगन्नाथ मंदिर हे श्रीकृष्णाला समर्पित आहे. पृथ्वीवरचे वैकुंठ म्हणून देखील हे मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर हे ठिकाण नीलांचल, निलगिरी आणि शकक्षेत्र या नावांनीही ओळखले जाते. जगन्नाथ रथयात्रा जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरात पोहोचते.
रथयात्रेचे वैशिष्ट्य
जगन्नाथ रथयात्रेदरम्यान, श्रीकृष्ण, देवी सुभद्रा आणि बलराम यांच्यासाठी कडुनिंबाच्या लाकडापासून रथ तयार केले जातात. समोर मोठा भाऊ बलराम यांचा रथ, मध्यभागी बहीण सुभद्राचा रथ आणि मागे जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्णाचा रथ असे रथयात्रेचे स्वरुप असते. या तिन्ही रथांना वेगवेगळी नावे आणि रंग आहेत. बलरामजींच्या जीं रथाला तलध्वज म्हणतात आणि त्याचा रंग लाल आणि हिरवा आहे. देवी सुभद्राच्या रथाला दर्पदालन किंवा पद्मरथ म्हणतात आणि हा रथ काळा किंवा निळा रंगाचा असतो. भगवान जगन्नाथाच्या रथाला नंदीघोष किंवा गरुध्वज म्हणतात आणि हा रथ पिवळा किंवा लाल रंगाचा असतो. नंदीघोषाची उंची ४५ फूट, तलध्वज ४५ फूट उंच आणि देवी सुभद्राचा दर्पदलन सुमारे ४४.७ फूट उंच आहे.