मुंबईतील ६, राज्यातील १३ जागांसाठी सोमवारी मतदान : लोकसभा निवडणूक पाचवा टप्पा

0

मुंबई, १९ मे : लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. त्यानंतर सोमवारी २० मे रोजी महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यात मुंबईतील ६, राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये मुंबईतील चुरशीच्या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि वायव्य मुंबई या सहा तसेच राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे अशा १३ लोकसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे.

मुंबईत काँग्रेस पक्षाकडून २ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर उर्वरित ४ जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार महायुतीशी दोन हात करणार आहेत. महायुतीमध्ये ३ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या. तर उर्वरित तीन जागांवर भाजपने शड्डू ठोकला होता.

मुंबईतील मतदारसंघ आणि उमेदवार

१. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव

२. दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई

३. उत्तर मुंबई – पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील

४. उत्तर मध्य मुंबई – उज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड

५. उत्तर पूर्व मुंबई – मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील

६. वायव्य मुंबई – रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर

कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती.
७. कल्याण : शिंदे गट श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गट वैशाली दरेकर

८. भिवंडी : भाजप कपिल पाटील विरुद्ध पवार गट सुरेश म्हात्रे

९. धुळे : भाजपा सुभाष भामरे विरुद्ध कॉंग्रेस शोभा बच्छाव विरुद्ध वंचित अब्दुल रेहमान

१०. दिंडोरी : भाजपाच्या भारती पवार विरुद्ध पवार गटाचे भास्कर भगरे

११. नाशिक : शिंदे गट हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गट राजाभाऊ वाजे विरुद्ध अपक्ष शांतिगिरी महाराज

१२. पालघर : भाजप हेमंत विष्णू सावरा विरुद्ध ठाकरे गट भारती कामडी विरुद्ध बविआ राजेश पाटील

१३. ठाणे : शिवसेना शिंदे गट नरेश म्हस्के विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. उत्तर प्रदेशनंतर हा सर्वांत मोठा आकडा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात यंदा सभांचा धडाका लावला होता. गेल्या चार टप्प्यांत महाराष्ट्रातील ३५ जागांवर मतदान पार पडले आहे. आता पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात सोमवार २० मे रोजी उर्वरित १३ जागांवर मतदान होणार असून दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.