Kuwait Building Fire: 45 भारतीय कामगारांचे पार्थिव मायदेशी आणले!

0

हवाई दलाचे एअरक्राफ्ट कोची एअरपोर्टवर दाखल

 

नवी दिल्ली(New Delhi):- कुवैतमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ४५ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ४५ भारतीयांचे पार्थिव घेऊन भारतीय हवाईदलाचे एअरक्राफ्ट देशात दाखल झाले आहे. गुरुवारी रात्री एक विशेष विमान भारतीयांचे पार्थिव परत आणण्यासाठी कुवैतमध्ये पाठवण्यात आले होते. हे एअरक्राफ्ट शुक्रवारी चारच्या सुमारास कुवैतमधून निघाले होते. ते कोची विमानतळावर उतरले आहे.

एअरक्राफ्ट C-130J भारतीय कामगारांचे पार्थिव घेऊन कोची विमानतळावर दाखल झाल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह यांनी दिली. ते स्वतः या एअरक्राफ्टमध्ये होते. मृत कामगारांमध्ये २४ जण केरळचे आहेत. त्यामुळे एअरक्राफ्ट आधी कोची एअरपोर्टवर उतरले आहे. त्यानंतर एअरक्राफ्ट दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. कारण, कारण काही मृत कामगार हे उत्तर भारतातील आहेत. सर्व मृतांची ओळख पटवण्यासाठी कुवैत प्रशासनाकडून मृतदेहांची डीएनए टेस्ट घेण्यात आली आहे.

किर्तीवर्धन सिंह यांनी कुवैतचे परराष्ट्र मंत्री अबदुल्ला अली अल-याह्या यांच्यासह इतर मंत्र्यांची भेट घेतली होती. परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला होता. याशिवाय किर्तीवर्धन यांनी मुबारक अल कबीर हॉस्पिटलला भेट देखील दिली होती. याठिकाणी अनेक जखमी भारतीयांवर उपचार सुरु होते. कितीर्वधन यांनी त्यांची विचारपूस केली.

कुवैतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीमध्ये एकूण ४९ जणांचा मृत्यू झालाय, त्यात ४५ भारतीयांचा समावेश आहे. पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीचे आश्वासन कुवैत सरकारने दिले आहे. तसेच, या अपघाताप्रकरणी चौकशी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास १५० जण इमारतीमध्ये राहत होते. आग लागली तेव्हा मुख्य दरवाजा आणि टेरसचे दार बंद होते. त्यामुळे अनेकांना बाहेर पडता आले नाही.

एनआरआय उद्योगपती आणि यूएईतील लूलू ग्रुपचे मालक युसुफ अली यांनी प्रत्येक पीडित कुटुंबासाठी ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबाबत माहिती घेतली होती. पंतप्रधान मोदी यांच्याकडून पीडित कुटुंबासाठी २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पीएम रिलीफ फंडमधून ही मदत केली जाईल.