४ जूनला देशातील जुमलापर्व संपणार

0

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद

मुंबई(Mumbai), 18 मे  भाजपाने १० वर्षे महाराष्ट्राला बदनाम केले. मुंबईची लुट करून गुजरातला घेऊन गेले. आता इंडी आघाडीचे सरकार आल्यानंतर ही लूट थांबवणार आहे. ४ जूनला देशातील जुमलापर्व संपणार असून अच्छे दिनची सुरुवात होणार आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केला.

हाॅटेल ग्रॅंड हयात येथे इंडी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.

देशातली जनता भाजपाच्या कारनाम्यांवर, तोडफोड नितीवर नाराज आहे. भाजपाच्या तोडफोड नितीविरोधात व अत्याचारी कारभाराविरोघात इंडी आघाडी लढत आहे. देशातील वातावरण इंडी आघाडीसाठी अनुकूल आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी ४६ जागा मिळतील व देशात सरकार स्थापन करु अशा विश्वास काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला.

काँग्रेस पक्षाने ५ न्याय २५ गॅरंटी दिल्या आहेत. ३० लाख सरकारी नोकऱ्या, महालक्ष्मी योजने अंतर्गत गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये, २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा, शेतीवरचा जीएसटी हटवणार, कर्जमाफी देणार, जीएसटी बदलून नवीन सरळ जीएसटी आणणार ज्याचा एकच दर असणार. युपीए सरकारने आणलेल्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार गरिब लोकांना महिन्याला १० किलो धान्य मोफत दिले जाईल, असेही खर्गे म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आली तर अयोध्यातील राम मंदिरावर बुलडोझर चालवतील हा मोदींचा आरोप जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बुलडोझर संस्कृती भाजपाची आहे काँग्रेसची नाही आणि काँग्रेस असे काहीही करणार नाही.

निवडणुकीत सावरकर मुद्दा नसल्याने राहुल गांधी कशाला काय बोलतील – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, इंडी आघाडीचे सरकार आल्यास १० किलो मोफत धान्य देण्याची योजना ही नरेंद्र मोदींच्या योजनेवरून घेतली आहे यात तथ्य नाही. डॉ. मनमोहन सिंग सरकारने अन्न सुरक्षा कायदा आणला व त्या अंतर्गत ही योजना आहे. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असून गहू उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. युपीए सरकारनेच ही योजना आणली होती असे पवार यांनी स्पष्ट केले. एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, निवडणुकीत सावरकर हा मुद्दा नाही त्यावर राहुल गांधी कशाला काय बोलतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी विनाकारण चिथावणी देण्याचे काम करत आहेत.