
चंद्रपूर: नागपुरातील अधिवेशनात काँग्रेस नेत्यांना निधीचे श्रीखंड मिळाले, ही जितेंद्र आव्हाड यांची टीका काँग्रेसला चांगलीच झोंबली आहे. संतापलेले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आव्हाडांच्या आक्षेपांना अत्यंत बोचऱ्या भाषेत उत्तर दिले. “जितेंद्र आव्हाड भांबावले आहेत, ते पागलासारखे झाले आहेत”, अशा शेलक्या शब्दात वडेट्टीवार यांनी आव्हाडांना सुनावले. त्यामुळे निधी वाटपावरून महाविकास आघाडीतील मतभेद पुढे आले आहेत.
आव्हाडांच्या टीकेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आम्ही काही कोणाच्या दालनात जावून पैसे मागितले नाहीत. मला, नाना पटोले व बाळासाहेब थोरातांनाही निधी मिळाली. कमी अधिक निधी सर्वांना मिळाला. आम्हाला जसा निधी मिळाला तसाच तो जयंत पाटील, राजेश टोपे यांनाही मिळाला. त्यांना आव्हाड काहीच बोलले नाहीत. आव्हाड यांनी आपल्या माणसांना बोलायला पाहिजे. आमच्यावरच टीका का करता? राष्ट्रवादीच्या आमदारांनी निधीसाठी प्रस्ताव पाठविला तसा आम्हीदेखील पाठविला होता. पूर्वीही असेच व्हायचे. आव्हाडांच्या डोक्यात काय घुसले आहे हे आम्हाला माहिती नाही. आव्हाड आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे मतदारसंघ लागून आहेत. त्यांचे आपसात काय आहे आम्हाला माहिती नाही. त्यांनी हा राग शिंदे यांच्यावर काढावा, असा सल्लाही वडेट्टीवारांनी दिलाय.