

कापूस, संत्रा, सोयाबिन उत्पादकांना ग्वाही
नागपूर(Nagpur) : राज्यातील शेतकऱ्यावर जेव्हा जेव्हा संकट कोसळले तेव्हा सरकार धावून आले आहे. मागील दीड दोन वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी ४५००० कोटी रुपये दिले आहेत. सोयाबीन, कापूस आणि संत्रा उत्पादकांच्या अडचणींवर सरकार काम करत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रामटेक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ नरखेड येथे मंगळवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
आपले पहिले सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यात अवकाळी, गारपीट होतेय, निवडणुका जरी असल्या तरीसुद्धा आपण स्वतः प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, काही लोक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवात की वर्ष २०२१-२२ मध्ये कापूसचा दर १३५०० रुपये प्रतिक्विंटल होता आता तितका भाव नाही. हे सत्य आहे, कारण जगामध्ये तेव्हा कापूस महाग होता. आपला दर जागतिक बाजारपेठेनुसार ठरतो. तेव्हा कापूस महाग असल्याने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले, मात्र आज कापसाचे भाव सगळीकडे कोसळले आहेत. त्यामुळे कापूस दर ८००० रुपये इतका आहे. जागतिक बाजारात कापसाचा दर हा अमेरिकेच्या कमॉडिटी मार्केटनुसार ठरवला जातो. त्यामुळे कापसाच्या भावाचा आणि अगोदरच्या सरकारचा काडीचाही संबंध नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संत्रा निर्यातीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बांग्लादेशने आयात शुल्क २० रुपयांवरुन ८० रुपये केले. त्यामुळे आपल्याकडील संत्री बांग्लादेशला निर्यात होत नाहीत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) म्हणाले की, आचारसंहिता असल्याने थेट बोलता येणार नाही पण आचारसंहिता संपल्यानंतर कापूस, सोयाबीन आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
देशाला विकासाकडे नेण्यासाठी तुमचे एक-एक मत महत्त्वाचे आहे. महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत, हे आपल्याला ठरवायचे आहे. येत्या १९ एप्रिल रोजी धनुष्यबाणाचे बटन दाबून राजू पारवे यांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मतदारांना केले. रामटेक प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. जो रामाचा नाही तो कामाचा नाही असे सांगत दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी राजू पारवे यांना विजयी करायचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
भाजपने जाहीरनाम्यात गरिबांना पुढील पाच वर्ष मोफत धान्य, मोफत वीज, मोफत गॅस कनेक्शन देण्याचे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला पण गरिबी हटली नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. याउलट मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ कोटी लोकांना दारिद्र्यातून मुक्त केले, असे त्यांनी सांगितले.