

भाजीपाला महागला
बुलढाणा(BULDHANA) – वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. परिणामी, बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच वधारले आहेत. तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे.
वांग्यासह इतरही भाज्यांचे दर किरकोळ बाजारात ४० ते ५० रूपये प्रतिकिलोवर पोहोचल्या आहेत. शहरात भाजी बाजारपेठेत बुलढाणा जिल्ह्यालगतच्या परिसरातील व गावखेड्यातून भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. पत्ता कोबी, फुलकोबी, सांभार, पालक, मेथी यासारखी भाजी जिल्ह्यातच पिकते. यामुळे भाजीबाजार बाहेरील मालावर फार अवलंबून नाही. पण आता ही आवकच घटल्याने दरात वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात टमाटरची भरपूर आवक होऊ लागली. शहराबाहेरील भाज्यांची आवक एकदम मंद झाली आहे. स्थानिक भाजीपालादेखील कमी प्रमाणात येत आहे. यामुळे दर दुप्पट झाले आहेत. केवळ पानकोबी, कोहळे सध्याच्या तुलनेत स्वस्त आहेत. उर्वरित भाज्यांची मात्र आवक कमी आहे. पुढील महिनाभर जवळपास हीच स्थिती राहण्याची शक्यता असल्याचेही भाजी विक्रेत्यांनी सांगितले.