
चंद्रपूर:-महाराष्ट्रात पुढील निवडणुकीनंतर महायुती सरकार आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम निश्चित पणे वाढविण्यासाठी प्रयत्न करीन, असे उद्गार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर भाजपा महिला मोर्चा तर्फे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलताना काढले.
ते पुढे म्हणाले 2,81,000 बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये टाकताना मला अतिशय आनंद झाला. कुठल्याही जातीची असो धर्माची असो रंगाची असो याचा विचार न करता महाराष्ट्रातील सर्व बहिणींना पंधराशे रुपये महिना मिळावा या दृष्टीने सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे.
या वेळी आधी 17 ऑगस्टला पैसे टाकावे असा सरकारचा विचार होता. परंतु इतक्या सर्व बहिणींच्या खात्यात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एवढे पैसे जमा होण्यास त्रास होईल या विचाराने 15 ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम सुरू झाला व हळूहळू तो पूर्णत्वाला नेण्याचा आनंद आम्हाला झाला आहे. हा आमच्या भगिनींच्या हक्काचा पैसा आहे आणि हा त्यांना मिळायलाच हवा या उद्देशाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू झाला याचाही मला अतिशय आनंद आहे.
यामध्ये ज्या बहिणी अजूनही या योजनेपासून वंचित असतील त्या सर्व बहिणींनी अजूनही फॉर्म भरावा 31 ऑगस्टपर्यंत ज्या बहिणी फॉर्म भरतील त्यांना जुलै व ऑगस्टचे पैसे एकत्रितपणे मिळतील. ज्या बहिणी 31 ऑगस्ट पर्यंत ही फॉर्म भरू शकणार नाही त्यांनी सुद्धा चिंता करू नये त्यांचा हा भाऊ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही योजना यातील प्रत्येक भगिनीला मिळेल याची खात्री मी देतो असेंजी त्यांनी नमूद केले.
















