(Nagpur)नागपूर : बिपरजॉय वादळामुळे विदर्भात मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच आगामी दोन दिवस विदर्भात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सून अद्याप सक्रिय झालेला नसल्याने विदर्भात तापमान सरासरीपेक्षा पाच ते सात अंशानी जास्त आहे. विदर्भातील (Gondia) गोंदिया, (Bhandara)भंडारा, (Nagpur) नागपूर, (Wardha)वर्धा, (Chandrapur)चंद्रपूर, (Yawatmal)यवतमाळ, (Akola)अकोला, (Washim)वाशिम आणि (Amravti)अमरावती या जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनपूर्व पाऊस होऊन उष्णता कमी होत असते. पण यंदा अद्याप पाऊस न झाल्याने तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवस विदर्भात उष्णता जास्त जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना उष्णतेपासून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मॉन्सून लांबणीवर पडणार?
बिपरजॅाय चक्रीवादळामुळे मॅान्सूनवर परिणाम झाला असून तो लांबण्याची भीती व्यक्त होत आहे. मॅान्सून लांबल्याने खरीप पेरणीचे नियोजन बिघडण्याची भीती आहे. विदर्भात मॉन्सूनचे आगमन कधीपर्यंत होणार, याबाबत हवामान खात्याला कुठलेच अंदाज लावता आलेले नाहीत.
















