

10 हजार दृष्टिहिन, 11 हजार डिझाईन, 72 देशात निर्यात
वायबीसीच्या ‘बिझनेस ग्रोथ कान्क्लेव्ह’ ला उत्तम प्रतिसाद
नागपुर(Nagpur) 2 जुन :– बँकेने कर्ज नाकारल्यानंतर केवळ आईने दिलेल्या हिमतीच्या बळावर महाबळेश्वरला मेणबत्त्या तयार करून हातगाडीवर विकायला प्रारंभ केला. ग्राहकांना ब्रँड ॲम्बेसेडर मानले, दृष्टीहिनांना रोजगार दिला आणि आज ‘सनराईज कॅन्डल्स’ मध्ये 10 हजार दृष्टिहिन कामगार 11 हजार डिझाईनच्या मेणबत्त्या तयार करतात आणि त्या 72 देशात निर्यात केल्या जातात.
सनराईज कँडल्सचे संस्थापक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते दृष्टीहिन उद्योजक डॉ. भावेश भाटिया(Dr. Bhavesh Bhatia) खुसखुशीत, शेरोशायरी आणि विनोदांची पेरणी असलेल्या प्रेरणादायी भाषणातून सनराईज कँडल्सचा प्रवास उलगडत होते आणि श्रोते थक्क होऊन त्यांचा हा प्रवास ऐकत होते. यंग इंडिया बिझनेस क्लबद्वारे हॉटेल तुली इंपीरियल येथे रविवारी ‘बिझनेस ग्रोथ कॉन्क्लेव्ह’ मध्ये डॉ. भावेश भाटिया यांनी उपस्थिती लावली. तत्पूर्वी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, क्लब चेअरमन रमाकांत खेतान, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक ॲड. देवेंद्र अग्रवाल, डॉ. दीपक केळकर, अमित अग्रवाल, साकेत चौरसिया, अमित राव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
डोळे असूनही दृष्टी नसेल यश मिळत नाही, असे सागताना डॉ. भाटिया यांनी यशाचे श्रेय आई व पत्नी नीता यांना दिले. गोंदियात स्पेशल स्कूलमध्ये शिकलो असतो तर अंधच राहिलो असतो. सामान्य शाळेत शिकत असताना कोप-यात बसून ठेवले जायचे. त्याच कोप-याने कल्पकतेचा दीप जीवनात चेतवला. आम्ही अंध असलो तरी आमच्या मेणबत्त्यांनी अनेकांचे आयुष्य प्रकाशमान केले. इन्फोसिस, रिलायसन्स, किंशफिशर सारख्या कंपन्यांना करोडो रुपयांच्या मेणबत्त्या विकत असल्याचे सांगतले. अनेक अडचणींचा सामना करत गोळाफेक, थालीफेक आदी पॅरालिम्पिक स्पर्धामध्ये 117 पदके कमावल्याचे सांगितले. योग्य दिशेने कठोर मेहनत केल्यास यश प्राप्त होते, असा सल्ला त्यांनी दिला.
देशाच्या अर्थव्यवस्थेचे संचालन करणा-या व्यापा-यांच्या हिताचा विचार केला गेला तर व्यापारी निश्चित होऊन काम करतील आणि विश्वासार्हतेसोबतच देशाचा चांगला विकास होण्याची शक्यता बळावेल, असे मत दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केले. अनेक उदाहरणे देऊन त्यांनी व्यापारामधील नवकल्पना, नवतंत्रज्ञान, मायक्रो मॅनेजमेंटचे महत्त्व विशद केले व सामाजिक दायित्व निभावण्याचादेखील सल्ला दिला.
याशिवाय, प्लास्टो इंडस्ट्रीजचे संचालक विशाल अग्रवाल, राम कूलर्सचे संचालक राकेश अवचट यांचेदेखील उपस्थितांना मार्गदर्शन लाभले. सोशल मिडीया मार्केटिंगवर पल्लवी बारस्के, पर्सनल ब्रँडिगवर स्नेहा टावरी तर स्ट्रैटेजिक ब्रांड बिल्डिंगवर तेजस्विनी भांडारकर यांचेही मार्गदर्शन मिळाले.
ॲड. देवेंद्र अग्रवाल यांनी वायसीबीच्या कार्याची माहिती दिली तर रमाकांत खेतान यांनी नवकल्पना, व्यापाराचे बदलते स्वरूप, नवे तंत्र, तंत्रज्ञान आदीबद्दल विचार मांडले. राज अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमितराव खजांची, आर्कि. रवी चौधरी, डॉ. पूनम हूदिया, डॉ. निराली श्रीराव, कमल शर्मा, विशाल अग्रवाल, पंकज अग्रवाल, योगेश अग्रवाल, अभिषेक जेजानी, विनोद वादीचार, प्रसाद फसाटे, राज अग्रवाल, सतीश अग्रवाल, आशीष शिवाल, संदीप अग्रवाल, प्रिया टटेवार,विक्रम मेश्राम, जीतू लालवानी, अतुल हसनी,मनोज जैन,पंकज महस्के, जयदीप धंदे, मनोज बागड़ी, श्रीकांत दिगंबर, विजय वर्मा यांचे सहकार्य लाभले.