मिचांग चक्रीवादळ : तीन राज्यांना सतर्कतेचा इशारा

0

 

Cyclone Michang: Alert alert for three states

नवी दिल्ली, 03 डिसेंबर : बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी खोल दाबात परिवर्तीत झालेय. त्यामुळे येत्या 12 तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आंध्र प्रदेश आणि लगतच्या तमिळनाडू किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे.

 

हे चक्रीवादळ सोमवारी 4 डिसेंबरला दुपारपर्यंत आंध्रप्रदेश आणि उत्तर तामिळनाडू किनार्याजवळ पोहोचेल. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशात धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. यातील 118 गाड्या लांब मार्गाच्या आहेत. तर तामिळनाडूमध्ये 100 एसडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वादळ मंगळवारी 5 डिसेंबरला सकाळी आंध्र प्रदेशच्या नेल्लोर आणि मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकेल. त्यावेळी वादळाचा वेग ताशी 80-90 किमी असेल. ते ताशी 100 किमीपर्यंत पोहोचू शकते. यासोबतच तामिळनाडूच्या तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेंगलपट्टू, चेन्नई, तेनकासी, थुथुकुडी, तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी जिल्ह्यांसह तमिळनाडूतील 5 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर आंध्रप्रदेशच्या रायलसीमा येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. यासोबतच ओडिशाच्या किनारी भागात 4-5 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

वादळामुळे मध्य रेल्वेने 3 ते 7 डिसेंबर दरम्यान धावणाऱ्या 144 गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, बंगळुरू, हैदराबाद, नवी दिल्ली, हावडा, लखनऊ, विशाखापट्टणम, तिरुपती, पुद्दुचेरी आणि इतर मार्गांवर धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.