
पुणे PUNE :भगवान श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR against Jitendra Awhad)
यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी तक्रार दिली होती. यावरुन कलम २९५ अंतर्गत आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाडांविरोधात भाजपने आव्हाड यांच्याविरोधात काल आंदोलन केले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली होती. अखेर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात त्यांना अटक होणार की कसे, याकडे लक्ष लागले आहे.
“राम मांसाहारी..”
आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य वादाचा विषय ठरले होते. शिर्डीत राष्ट्रवादीच्या शिबीरात आव्हाड यांनी राम मांसाहारी होते, असे वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला. त्यामुळे आता भाजपने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची व अटक करण्याची मागणी केली होती. (Jitendra Awhad Controversial Statement) मुंबई, पुणे, नाशिक व नागपूरसह राज्यात अनेक ठिकाणी भाजपने आव्हाड यांच्याविरुद्ध आंदोलन सुरु केले होते. विधान अंगलट आल्यावर आव्हाड यांनी खेद व्यक्त करीत असल्याची भाषाही केली होती. मात्र, आपले विधान अभ्यासावर आधारित असल्याचा दावाही त्यांनी सोबतच केला होता.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबीरात जितेंद्र आव्हाड यांनी मुक्ताफळे उधळली. “राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असे वक्तव्य आमदार आव्हाड यांनी केले होते. आव्हाड पुढे म्हणाले की, आपण अनेक इतिहास लक्षात ठेवत नाही, वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्ष जंगलात असणारे राम शिकार करायचे, असेही ते म्हणाले.