नागपूरच्या भूमीतून काँग्रेस देणार परिवर्तनाचा संदेश – नाना पटोले

0

 

 

-देशाची लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा एल्गार
-देशभरातील काँग्रेस नेते नागपुरात, महागाई, बेरोजगारी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘काँग्रेस है तैयार’!

नागपूर -देशावर जेव्हा संकट येते तेव्हा याच नागपूरच्या भूमीतून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान व लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत, ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व असल्याने काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी २८ डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या जुलमी, अत्याचारी व अहंकारी सरकारला घरी बसवण्यासाठी एल्गार पुकारुन परिवर्तनाचा संदेश दिला जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
काँग्रेसच्या १३८ व्या वर्धापन दिनाचा सोहळा नागपूरच्या दिघोरीस्थित ‘भारत जोडो’ मैदानात होत आहे. या महामेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून देशभरातील काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले आहेत. आज मैदानाची पाहणी केल्यानंतर पटोले माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत देशात परिवर्तनाचा संदेश दिला जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकत्र झाला व हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानाने जुलमी, अत्याचारी ब्रिटिशांना देश सोडण्यास भाग पाडले. स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे, आज पुन्हा महाराष्ट्राच्या भूमितून देश वाचवण्याच्या लढाईचा एल्गार पुकारला जात आहे. ६० वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेत पंडित जवाहरलाल नेहरुंपासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत भारताला एक महाशक्ती म्हणून उभे केले पण दुर्दैवाने मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशाला रसातळाला नेले. जाती-धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये भांडणे लावून देश अधोगतीकडे नेला. आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे.संसद सुरक्षेवर प्रश्न विचारले म्हणून १५० खासदारांना निलंबित केले पण काँग्रेस अशा कारवायांना भीक घालत नाही. जगातील बलाढ्य ब्रिटिशांना जसे देश सोडून जाण्यास भाग पाडले तसेच या हुकूमशाही भाजपालाही घरी बसवू. राहुलजी गांधी यांनी ‘डरो मत’ चा नारा दिला आहे, त्याच मार्गाने जावून भाजपाला सत्तेतून खाली खेचू, असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.
आज महागाई, शेतकरी, कामगार, तरुणांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. सरकारी यंत्रणा वेठीस धरल्या आहेत. सरकारच्या विरोधात आवाज काढणाऱ्यांना शिक्षा केली जात आहे. देश कठीण प्रसंगातून जात आहे त्याला वाचवण्यासाठी काँग्रेसची ही लढाई असून देशाला वाचवणे हीच काँग्रेसची गॅरंटी आहे. काँग्रेसमध्ये उत्साह असून विविध मुद्द्यावर परिवर्तनासाठी ‘हम तैयार है’, असेही नाना पटोले म्हणाले.