

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना उपरोधक टोले लगावले. मनोज जरांगे यांच्या संदर्भातील आपली सर्व भाषणे व वक्तव्य आपण मागे घेत आहोत आणि त्यांच्या सर्व मतांशी आपण सहमत आहोत, असे उपरोधिक वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे. देवसुद्धा मनोज जरांगे यांना घाबरतो, त्यामुळे सरकारने त्यांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य कराव्या आणि काही मंत्र्यांना त्यांच्या आंदोलनस्थळी कायमस्वरुपी बंगले द्यावेत म्हणजे त्यांनी मागणी उच्चारताच ती सरकारला पूर्ण करता येईल, या शब्दात भुजबळ यांनी टोले लगावले. (Chhagan Bhujbal on Manoj Jarange)
भुजबळ म्हणाले की, जरांगे सरकारला वेठीस धरत नाहीत तर, सरकारनेच त्यांना वेठीस धरले आहे. सरकारने जरांगेंचे ऐकायला पाहिजे. मंत्र्यांचे दोन-चार बंगले तिथेच बांधले पाहिजेत. त्यांना रोज अभिनव कल्पना येतात, त्यांचा आदर राखला पाहिजे. देवसुद्धा त्यांना घाबरतो, सासू-सासरे, मित्र अशा सर्वांना दाखले द्या. सर्वांना आरक्षण द्यायला पाहिजे. आपण जरांगे यांचे ऐकले पहिजे. नाहीतर मोर्चा घेऊन ते येतील. व्याह्याचे व्याही व्याह्याचे व्याही, असे सर्वांना आरक्षण दिले पाहिजे. माझे तर म्हणणे आहे की, सरकारने वाटाघाटीचा घोळ घालू नये. ते सांगतात सरकार मान्य करत आहे. मी तर जरांगे यांना सपोर्ट करतोय. सरकारने फक्त त्यांचंच ऐकायचं, देवसुद्धा त्यांना घाबरतो, असेही ते म्हणाले.