

एखाद्या राणीनं आपल्या पतीच्या स्मरणार्थ निर्माण केलेली पहिली भव्य समाधी आहे चंद्रपुरात, राणी हिराईने राजा बीरशहाच्या स्मरणार्थ उभी केली आहे रेखीव भव्य वास्तू, अठराव्या शतकातील ही समाधी आजही अतूट प्रेमाची साक्ष देत आहे उभी , व्हॅलेंटाईन डे आज सर्वत्र साजरा होत असताना आजच्या प्रेमवीरांना अजरामर प्रेमाचं महत्त्व समजवण्याचा प्रयत्न करत आहे . प्रेमाचं अमर प्रतीक म्हणून जगात ताजमहालचं नाव घेतलं जातं. शहाजहाँनने आपल्या लाडक्या पत्नीच्या म्हणजे मुमताजच्या स्मरणार्थ हे अतुलनीय स्मारक निर्माण केलं. पण एखाद्या राणीनं आपल्या पतीच्या स्मरणार्थ निर्माण केलेली पहिली भव्य समाधी चंद्रपुरात अस्तिव राखून आहे. राजा बीरशहाची समाधी म्हणून ती ओळखली जाते. अठराव्या शतकातील ही समाधी आजही अतूट प्रेमाची साक्ष देत इथं उभी आहे. व्हॅलेंटाईन डे आज सर्वत्र साजरा होत असताना आजच्या प्रेमवीरांनी या समाधीमागचं खरं मर्म समजून घेण्याची गरज आहे. चंद्रपूरवर सतराव्या शतकात गोंड राजांचं राज्य होतं. राजे बीरशहा हे शासक होते. राणी हिराई आणि राजे बीरशहा यांचं एकमेकांवर निरतीशय प्रेम होतं. राजे बीरशहा यांच्या मृत्यूनंतर राणी हिराईनं कारभार आपल्या हाती घेतला.
पण राणी हिराईच्या हृदयात वसले होते ते राजे बीरशहा. बीरशहांचा मृत्यू राणी हिराईला असहनीय होता. एकीकडे राज्य कारभार आणि दुसरीकडे पतीच्या आठवणींची व्याकुळता. अशा वेदनादायी मनःस्थितीत राणी हिराईनं आपल्या प्रिय पतीच्या स्मरणार्थ भव्य समाधी उभारण्याचा निर्णय घेतला. आज जिथं अंचलेश्वर शिवमंदिर आहे, त्याच परिसरात राजा बीरशहाची समाधी बांधण्यात आली. जगप्रसिद्ध ताजमहालची निर्मिती ही राजानं आपल्या राणीच्या स्मरणार्थ केली, तर इथं राणीनं आपल्या पतीच्या स्मरणार्थ ही समाधी बांधली. शहाजहाँनं ताजमहालची निर्मिती करताना आधी मॉडेल तयार करायला सांगीतले. त्यातील मुसा या कारागीरानं तयार केलेली प्रतिकृती त्याला आवडली आणि नंतर ताजमहालची निर्मिती झाली. अशाच पद्धतीनं राणी हिराईनंसुद्धा दगडाचं मॉडेल तयार करून घेतलं. ते आवडल्यावर या समाधीची निर्मिती झाली. आजही हे दगडाचं मॉडेल नागपुरातल्या वस्तु संग्रहालयात ठेवलेलं आहे. बीरशहाची समाधी ही सँड स्टोननं बांधली असून, चुण्याची जुळवणी आहे. एखाद्या राजाची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी समाधी आहे.
त्यामुळं या समाधीचं प्राचीन वास्तू म्हणून महत्त्व तर आहेच, शिवाय प्रेमाचं प्रतीक म्हणूनही या समाधीची विशेष ओळख आहे. स्थानिक इको प्रो संस्था यानिमित्ताने दरवर्षी या समाधीवर पुष्प अर्पण सोहळा आयोजित करते.आज व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा केला जातो. प्रेमाचं प्रदर्शन केलं जातं. प्रेमाच्या नावाखाली तरुणाई ब-याचदा सीमोल्लंघन करते. अशा तरुणाईला राणी हिराई आणि राजे बीरशहाच्या प्रेमाचं महत्त्व पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. आज या समाधीला भेट देऊन अनेक विवाहित जोडपेसुद्धा आपल्या प्रेमाची कबुली देतात. पुरातत्त्व विभागासाठी ही समाधी दुर्लक्षीत असली, तर सच्चे प्रेमवीर मात्र या समाधीपासून प्रेरणा घेतात. ज्यांना प्राचीन इतिहासाचा आणि स्थापत्य कलेचा अभ्यास करायचा आहे, असे संशोधक इथं भेट देत असतात. सध्या ही समाधी आणि हा परिसर तेवढ्यापुरताच मर्यादित झाला आहे. आजच्या प्रेमवीरांना अजरामर प्रेमाचं महत्त्व समजवण्याचा प्रयत्न मात्र इको प्रो सारख्या संस्था धडपडीने करत आहेत.