

नागपूर (Nagpur): राज्यात दुसऱ्या टप्प्यात येत्या 26 एप्रिल रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा यवतमाळ- वाशिम आणि पूर्व विदर्भातील वर्धा अशा पाच लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक होत आहे. आज बुधवारी सायंकाळी निवडणूक प्रचारतोफा शांत झाल्या. राज्यात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघातील मतदान नुकतेच 19 एप्रिलला आटोपले. निवडणूक होऊ घातलेल्या पाच लोकसभा मतदारसंघांचा विचार करता अमरावतीत विद्यमान खासदार नवनीत राणा यावेळी भाजपच्या उमेदवार असून विरोधात काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे प्रहारचे दिनेश बुब आणि आनंदराज आंबेडकर असा तर यवतमाळमध्ये महायुतीच्या राजश्री पाटील विरुद्ध मविआचे संजय देशमुख, वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस,महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचे अमर काळे अशी लढत होत आहे. दुसरीकडे बुलढाणा मतदारसंघात विद्यमान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे विरोधात महाविकास आघाडीतर्फे नरेंद्र खेडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर असा तर अकोला मतदारसंघात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील अशी लढत आहे.