

चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन सेवा प्रकल्पात 4 दिवसांपूर्वी झालेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव समाधान माळी असे आहे. वरोरा येथील बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत २६ जून रोजी आरती दिगंबर चंद्रवंशी (वय २५) या विवाहितेची हत्या करण्यात आली होती. हिंगणघाट येथील सासर सोडून आरती काही महिन्यांपासून आपल्या आईवडिलांसोबत वास्तव्याला होती. याच काळात तिची ओळख समाधानशी झाली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित आरोपी समाधान माळी याला चोवीस तासांत अटक केली. आरतीच्या हत्येमागे लव्ह – ब्रेकअप – मर्डर असे वळण असल्याचे पोलिस तपासात समोर आले.
आरोपी समाधानला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी असून, तो एक वर्षाआधी आनंदवनात उपचाराला आला होता. तिथेच त्याचा परिचय आरतीशी झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, आरोपीने रात्री पोलीस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केली. बुटाच्या लेसचा आत्महत्येसाठी वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहीती पुढे येत आहे. घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.