


मुंबई(Mumbai), 18 मे पंतप्रधान देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले ते हळूहळू संपवण्याचे काम भाजपा करत आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचा नरेंद्र मोदी सामना करु शकत नाहीत, हरवू शकत नाही म्हणून खोटी तक्रार करुन जेलमध्ये टाकले. गरीब मुलांना चांगले शिक्षण व आरोग्याची सुविधा उपलब्ध केली हेच मोदींना नको आहे त्यासाठीच मला अटक करण्यात आली. २ तारखेला पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे पण इंडी आघाडीचे सरकार आले तर मात्र जेलमध्ये जावे लागणार आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सर्व विरोधकांना एक तर जेलमध्ये टाकले किंवा त्यांना संपवले. नरेंद्र मोदी भारतातील विरोधकांना जेलमध्ये टाकत आहेत. बांग्लादेशातही तेच चालले आहे. पाकिस्तानतही तेच चालले आहे, मोदी सुद्धा भारताला पाकिस्तान, बांग्लादेश बनवू पहात आहेत. मोदी सरकार पुन्हा आले तर ठाकरे, शरद पवार प्रियंका गांधी सर्व विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकले जाईल, अशी भिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.
मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, AICC चे सचिव आशिष दुआ, बी. एम. संदीप, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेना खासदार संजय राऊत, तुषार गांधी आदी उपस्थित होते.