

पुणे-खासदार सुप्रिया सुळे यांच्या निलंबनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केवळ सुप्रिया सुळे यांचे एकट्याचे निलंबन झालेले नाही, अनेक खासदारांचे निलंबन झाले आहे व संसदेत नियमाचा भंग झाल्याने कारवाई केली आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, जेव्हा खासदार किंवा आमदार विधिमंडळांत, लोकसभेत आणि राज्यसभेत काम करत असतात. त्यावेळी कुठल्या तरी नियमाचा भंग झाल्यास त्याप्रमाणे कारवाई केली जाते. त्यानुसारच निलंबनाची कारवाई झालेली आपण पाहिली आहे. तिथे काय घडले? हे मला माहित नाही. विधानसभेत काय घडले? हे विचारले असते तर मी सांगितले असते. माझ्या माहितीप्रमाणे संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान करण्यात आला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील ही महत्त्वाची पदे आहेत. एवढ्या मोठ्या भारतात लोकशाही पद्धतीने निवडून गेलेले ते लोक असतात. ते आपापले काम योग्य पद्धतीने करत असतात. कारण ज्यावेळी एवढा मोठा समाज त्यांच्या पाठिशी उभा राहतो आणि त्यांच्या विचारांच्या लोकांना निवडून देतो. याचा अर्थ त्यांनी कुठेतरी जनाधार मिळवलेला असतो. उपराष्ट्रपतीही अतिशय व्यवस्थितपणे आपलं स्वत:चं काम पार पाडत असतात, असे अजित पवार म्हणाले.