
बुलढाणा – शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याऐवजी उलट वाढताना दिसत आहे. अस्मानीसह सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हताश झालेला दिसत आहे. अशातच खरीप पिक हातातून निघून गेल्यावर आता अवकाळी पाऊस आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकांवर देखील विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकऱ्याने आपल्या दहा एकर हरभरा पिकावर रोटावेटर फिरवला आहे. बुलढाणा तालुक्यातील चिखला येथील हरिदास खांडेभराड यांच्याकडे 14 एकर जमीन आहे. यामध्ये त्यांनी खरीपामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र उत्पन्नात मोठी घट झाल्याने त्यांचा खर्च निघाला नाही त्यामुळे त्यांना आता रब्बी पिकांवर मोठी आशा होती. त्यांनी आपल्या दहा एकर शेतात हरभरा पिकाची लागवड केली त्याला जवळपास पावणेदोन लाख रुपये खर्च आला. मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर बुरशी दह्या रोग आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांचे उभे पीक जळत आहे. आणि त्यामुळे या शेतकऱ्याने छातीवर दगड ठेवून या संपूर्ण दहा एकरातील हरभरा पिकात रोटावेटर चालवून पीक उद्ध्वस्त केले आहे. त्यांचा रब्बी पिकावरील जवळपास पावणेदोन लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे आता बँकेचे कर्ज कसे द्यायचे या विवंचनेत शेतकरी पडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी देखील शेतकरी हरीदास खांडेभराड यांनी केली आहे.