‘बीआरएस’च्या 6 आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

हैदराबाद(Hyderabad), 05 जुलै :- तेलंगणात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाने भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) 6 आमदार फोडले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सातत्याने बीआरएसला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानुसार बीआरएसच्या 6 विधान परिषद आमदारांनी गुरुवारी पक्षत्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बीआरएसच्या या 6 आमदारांना तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसचे सदस्यत्व बहाल केले. के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या 6 आमदारांमध्ये दांडे विठ्ठल, भानू प्रसाद राव, एम. एस. प्रभाकर, बोग्गरापू दयानंद, येग्गे मल्लेशम आणि बसवराजू सरैया यांचा समावेश आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी बीआरएसचे आमदार मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या निवासस्थानी आले तेव्हा काँग्रेसच्या तेलंगणाच्या प्रभारी दीपा दासमुंशी आणि इतर नेते उपस्थित होते. दरम्यान, मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बीआरएसचे 6 आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. तसेच आणखी काही आमदार सत्ताधारी पक्षात दाखल होऊ शकतात.

बीआरएसला दोन दिवसांपूर्वीही मोठा धक्का बसला होता. तेव्हा बीआरएसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार के. केशव राव काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी तसेच रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.